नाथपरंपरेचा अमूल्य वारसा “तो गोदातटी धामनगर । तया अरण्यात गौरकुमार । परम झाला क्षुधातुर । जठरावल करोनिया ।।” असा हा गोदावरी तीरावरील धामनगर (धामोरी) नाथसंप्रदायाच्या तेजस्वी तपश्चर्येचा, भक्तीचा व ब्रह्मज्ञानाचा जिवंत इतिहास आजही जपत आहे.
Oplus_131072
कोपरगाव –महेश जोशी याज कडून
नवनाथ संप्रदायाचे आदिपीठ म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र धामनगर (सद्याचे धामोरी) हे स्थान अध्यात्म, तपस्या व दीक्षेच्या दैदीप्यमान परंपरेचे साक्षीदार आहे. हे पवित्र क्षेत्र ॐ चैतन्य जती अडबंगीनाथांची जन्मभूमी, तपोभूमी व दीक्षाभूमी म्हणून अखिल नाथसंप्रदायात विशेष मानाचे स्थान राखून आहे.
श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या अध्याय ३४, ओवी क्रमांक ६२ मध्ये उल्लेखिलेल्या ‘धामनगर’ या धामपुराचाच आजचा धामोरी ग्राम असल्याचे स्पष्ट होते. गोदावरी तीरावर वसलेले हे स्थान शतकानुशतके योग, साधना व भक्तीचा केंद्रबिंदू राहिले आहे. येथील नऊ फांद्यांनी व्याप्त असलेला गोरक्षचिंच महावृक्ष अतिप्राचीन असून आयुर्वेदशास्त्रानुसार बहुरोगनाशक मानला जातो. हा वृक्ष केवळ निसर्गवैभव नसून, नाथसंप्रदायाच्या तपश्चर्येचा सजीव साक्षीदार आहे.
Oplus_131072
हे क्षेत्र ॐ चैतन्य जती मच्छिंद्रनाथ, ॐ चैतन्य जती गोरक्षनाथ व ॐ चैतन्य जती चौरंगीनाथ यांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत झाले आहे. दरवर्षी माघ शुद्ध द्वितीया रोजी येथे धर्मनाथ बीजोत्सव मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने साजरा केला जातो.
‘जती अडबंगीनाथांची नगरी’ – तपश्चर्येचा अद्भुत अध्याय धामोरी ग्रामातील मांजरे कुळातील माणिक शेतकरी हेच पुढे नाथसंप्रदायातील तेजस्वी तपस्वी ठरले. एके दिवशी प्रयागक्षेत्राहून तीर्थभ्रमण करत आलेले ॐ चैतन्य जती गोरक्षनाथ गोदातीरी वसलेल्या धामनगरात आले. माणिक शेतकऱ्यांनी त्यांना आदराने भोजनास बसविले.
भोजनानंतर वर मागण्यास सांगितल्यावर माणिक शेतकरी म्हणाले, “मिक्षापात्र हाती घेऊन दारोदार फिरणारे आपण मागावे?” माणिकांचा हा अडबंग स्वभाव पाहून गोरक्षनाथांनी त्यांच्या कल्याणाचा संकल्प केला.
गोरक्षनाथांनी माणिकांकडून असे वचन घेतले की, मनात जे येईल त्याच्या अगदी विरुद्ध वागायचे. त्यानुसार माणिकांनी संसाराकडे पाठ फिरवून वेटन व औताचा भार डोक्यावर घेऊन सलग बारा वर्षे अन्नपाण्याविना एका जागी कठोर तपश्चर्या केली.
ही विलक्षण तपश्चर्या पाहून ॐ चैतन्य जती चौरंगीनाथ व गोरक्षनाथांचे नेत्र अश्रूंनी भरून आले, तर ॐ चैतन्य जती मच्छिंद्रनाथांचे हृदय करुणेने कळवळले.
दीक्षेच्या वेळी माणिकांच्या अडबंग स्वभावामुळे गोरक्षनाथांनी युक्तीने त्यांना गुरु-शिष्य संवादात गुंतवले. अखेरीस कानी मंत्र पुटपुटताच माणिक शेतकऱ्यास ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. मच्छिंद्रनाथांच्या आदेशानुसार, “हा अडबंग आहे, म्हणून याचे नामाभिधान ‘अडबंगीनाथ’ करावे,” असे सांगून गोरक्षनाथांनी त्यांना दीक्षा दिली. तेव्हापासून हे स्थान ॐ चैतन्य जती अडबंगीनाथांचे पवित्र अधिष्ठान म्हणून प्रसिद्ध झाले.
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)*
वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत