संपूर्ण नेवासा शहराला दररोज पहाटे हरिनामने पवित्र करणारी परंपरा
नेवासा
परमपूज्य राधाकृष्ण महाराज आणि परमपूज्य भास्करगिरी महाराज यांच्या निर्देशानुसार नेवासा शहरात सुरू झालेल्या अखंड प्रभात फेरीला आज चौदा वर्षे पूर्ण झाली. तब्बल चौदा वर्षांचा हा कालावधी पूर्ण करत पंधराव्या वर्षात पदार्पण करणारी ही प्रभात फेरी आज नेवासातील नागरिकांच्या श्रद्धा, निष्ठा आणि भक्तीचा जिव्हाळ्याचा विषय ठरली आहे. दररोज पहाटे ‘राम कृष्ण हरी’च्या अखंड नामजपाने संपूर्ण नेवासा नगरी पवित्र करणारी ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.
प्रभात फेरीच्या पहिल्या दिवशी हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. स्वतः राधाकृष्ण महाराज यांच्या उपस्थितीत पहिली फेरी निघाली आणि त्या मंगल क्षणापासून या उपक्रमाला भक्तिभावाची भक्कम पायाभरणी लाभली.

आठवड्यातील प्रत्येक दिवशी नेवासा शहरातील विविध भागांतून फिरणारी ही राम कृष्ण हरी प्रभात फेरी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारी ठरली आहे. या फेरीचे ज्येष्ठ व सन्माननीय सदस्य म्हणून ढवळे सर, मुरलीधर कराळे सर, अनंतराव नळकांडे, अंबादास देशपांडे, सुनिल मैदाड, अर्जुन रंगमले, चंद्रकांत डाके, कुमार शिंदे, अशोक गरुटे, ज्ञानेश्वर वाघ, गरुटे मावशी आणि रोहिणी मापारी हे कार्यरत आहेत.
चौदा वर्षपूर्तीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर मंदिर येथे उमेश शिंदे यांच्या हस्ते सर्व सन्माननीय सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या प्रभात फेरीच्या सर्व सदस्यांना पुढील अनंत काळासाठी प्रेस क्लबच्या वतीने अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या.

