अहिल्यानगर आरोग्य भरती संघटनेचा उपक्रम…
नेवासा
सोनई येथील सेवाभावी वैद्यकीय व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. केदारनाथ चांडक यांच्या स्मरणार्थ आरोग्य भारती संघटनेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहरातील ज्येष्ठ डॉक्टर डॉ. गीताराम कुलकर्णी यांना कै. डॉ. केदारनाथ चांडक स्मृती निमित्त धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
समाजाच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी व्यक्तीपासून समष्टीपर्यंत विचार करणाऱ्या आरोग्य भारती संघटनेतर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व्हावा आणि सेवाभावी कार्याला प्रोत्साहन मिळावे, हा या कार्यक्रमामागील उद्देश होता.
कार्यक्रमात जिल्ह्यातील सामाजिक, वैद्यकीय, अध्यात्मिक व सेवा क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. किशोर पुरकर, डॉ. पौर्णिमा पुरकर, नितीन कुलकर्णी, माधुरी कुलकर्णी, डॉ. शेजुळ ,डॉ. विप्रदास, तालुका संघचालक प्रशांत मापारी तसेच परिवारातील सदस्य उपस्थित होते.
सन्मान पत्राचे करताना डॉ. किशोर पुरकर यांनी वैद्यकीय क्षेत्र व्यवसायमूलक होत चालल्याची खंत व्यक्त केली. उपचारानंतरही अनेक रुग्ण मानसिक तणाव व डिप्रेशनमध्ये जात असल्याची बाब त्यांनी मांडली. बीपी व शुगरसारखे आजार मोठ्या शहरांत स्टेटस सिम्बॉल बनत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पूर्वी नैसर्गिक औषधी वनस्पती, परिश्रमप्रधान जीवनशैली, ऋतूनुसार आहार आणि सामूहिक जीवनपद्धतीमुळे आजार कमी लागत असत; मात्र आज त्याचा अभाव जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी डॉ. गीताराम कुलकर्णी यांचे कार्य अधोरेखित करताना सांगितले की, साधेपणा, सेवाभाव आणि उच्च विचार ही त्यांची ओळख आहे. सुरुवातीला बैलगाडीतून, नंतर सायकल, मोटारसायकल आणि पुढे जीप-कार अशा प्रवासातून त्यांनी तालुक्यातील दुर्गम गावांत जाऊन वैद्यकीय सेवा दिली. शिस्तबद्ध व सात्विक जीवनशैली हेच त्यांच्या यशस्वी आयुष्याचे रहस्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुरस्कार स्वीकार करताना डॉ. गीताराम कुलकर्णी यांनी संघ परिवार व आरोग्य भारती संघटनेने या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आणि आपण केलेल्या वैद्यकीय सेवेचा विचार करून निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

