नेवासा प्रतिनिधी
– नेवासा तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली असून समाजातील अंधश्रद्धा, धर्मांधता आणि भोंदूगिरीविरोधात कृतिशील कार्यक्रम राबविण्याचा विचार व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर कॉम्रेड बाबा आरगडे यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर डॉ. अशोकराव ढगे यांनी समाजाला जागरूक करण्याचे आवाहन केले.
डॉ. ढगे म्हणाले की, भोंदू बाबांविरोधात मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेली स्पष्ट आणि सडेतोड भूमिका योग्य आहे. अलीकडे भोंदू बाबा अशोक खरात यांच्या अघोरी कृत्यांमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. हिंदू धर्म परंपरेने तात्त्विक व वैचारिकदृष्ट्या महान असला तरी काही भोंदू बाबा धर्माचा गैरवापर करून समाजाची दिशाभूल करत अनैतिक कृत्यांद्वारे धर्मालाच बदनाम करत आहेत. त्यामुळे समाजाने धर्मांध न होता विवेकबुद्धीने विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्याचा समाज अतिशय गतिमान झाला असला तरी काही वेळा हरिभक्त परायण (ह.भ.प.) महाराजांच्या वाईट कृत्यांची माहिती समाजासमोर येत नाही. त्यांच्या शिष्यांकडून स्वार्थासाठी केवळ चांगली बाजूच भडकपणे मांडली जाते, याचा गैरफायदा भोंदू बाबांकडून घेतला जातो. तथापि आजच्या काळात अनेक साधुसंत समाजप्रबोधनाचे चांगले कार्य करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
समाजामध्ये वाढत असलेल्या वैचारिक प्रदूषणामुळे अत्याचार, अनाचार, दुराचार आणि बलात्कारासारख्या घटना घडत असल्याची खंत व्यक्त करत समाजकारणासाठी समाजाला योग्य दिशा देणाऱ्या खऱ्या संत-महाराजांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे तात्त्विक आणि मौलिक विचार समाजासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचेही ते म्हणाले.
समाजामध्ये डोळसपणा निर्माण होणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून तसेच जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी युवकांनी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन डॉ. अशोकराव ढगे यांनी केले.

