: नेवासा
तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी उभ्या पिकांसह फळबागा व साठवलेला शेतीमाल बाधित झाला असून काही गावांमध्ये घरांची पडझड होऊन पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे गोरगरीब कुटुंबांचा आधार हिरावला गेला असून शेतकरी वर्ग गंभीर आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून अनेक कुटुंबे चिंतेत आहेत.
या पार्श्वभूमीवर शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला द्यावेत तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मदत वाटपाची प्रक्रिया जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने राबवून प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवावी, जेणेकरून शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यास मोठा दिलासा मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुल शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

