आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचा मोठा निर्णय
नेवासा (प्रतिनिधी): तालुक्यातील चिलेखनवाडी येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी लोकनियुक्त सरपंच श्री. भाऊसाहेब सावंत यांचे अमरण उपोषण व ग्रामस्थांचे धरणे आंदोलन ७ एप्रिल पासून सुरू करण्यात आले होते ग्रामस्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानेआमरण उपोषण व धरणे आंदोलन अखेर यशस्वीरीत्या मागे घेण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री. नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी केलेल्या विशेष मध्यस्थीमुळे आणि प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगीत करण्यात आले . ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे
नाथाभाऊ शिंदे यांची महत्त्वपूर्ण मध्यस्थी
उपोषणाची दखल घेत नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी चळवळीच्या कार्यकर्त्यांसह, राजेंद्र गरड आणि बाळासाहेब थोरात यांच्या समवेत उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून उपोषण सोडवण्याचा आग्रह धरला. ग्रामस्थांच्या समस्यांच्या निवारणासाठी त्यांनी तत्काळ नेवासा तालुक्याचे आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. आमदारांनी सर्व रास्त मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
प्रशासकीय हालचाली आणि लेखी आश्वासन
आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या रस्त्यांच्या मोजणीच्या प्रश्नावर नाथाभाऊ शिंदे यांनी भूमी अभिलेखचे उपअधीक्षक संदीप गोसावी यांच्याशी संपर्क साधून कामाला गती देण्याचे सूचित केले. तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्री. संदीप चिंतामणी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाचे अधिकृत पत्र सुपूर्द केले.

