डिसेंबरअखेर मुदत संपणार
शनिशिंगणापूर, दि. १८ — श्री शनैश्वर देवस्थानच्या कारभारावरून सुरू असलेल्या वादाला अखेर न्यायालयीन शिक्कामोर्तब मिळाले असून औरंगाबाद खंडपीठाच्या स्पष्ट आदेशानंतर देवस्थानचा पदभार पुन्हा जुन्या विश्वस्त मंडळाकडे सोपवण्यात आला. उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी अध्यक्ष भागवत बानकर व विश्वस्तांच्या ताब्यात देवस्थानचे सर्व प्रशासकीय व आर्थिक अधिकार सुपूर्द केल्याचे अधिकृत पत्र दिले.
प्रशासकीय समितीकडील कामकाजाचा संपूर्ण ताबा विश्वस्त मंडळाकडे देताना देवस्थानच्या बँक खात्यांचा जमा–खर्च तपशील, सुमारे १५० फाईल्स आणि बँक व्यवहारांचे अधिकारही हस्तांतरित करण्यात आले. या प्रक्रियेमुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय अनिश्चिततेला पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे.
राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने २२ सप्टेंबर रोजी विश्वस्त मंडळ बरखास्त करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर देवस्थानचे कार्यालय सील करून उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय प्रशासकीय समितीमार्फत कारभार चालवण्यात येत होता. मात्र या निर्णयाविरोधात जुन्या विश्वस्त मंडळाने खंडपीठात दाद मागितली होती.
संपूर्ण सुनावणीनंतर १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद खंडपीठाने प्रशासक नेमणुकीचा शासन निर्णय रद्द करत सात दिवसांच्या आत कारभार जुन्या विश्वस्त मंडळाकडे देण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या निर्देशानुसार नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती होईपर्यंत देवस्थानचा कारभार आणि बँक व्यवहार जुनेच विश्वस्त पाहणार आहे

