आदरणीय आमदार सत्यजित तांबे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या गुणवत्तेबाबत व्यक्त केलेली चिंता निश्चितच गांभीर्याने घेण्यासारखी
नेवासा
महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य कृषी विद्यापीठ म्हणून राहुरी कृषी विद्यापीठाची ओळख निर्विवाद आहे. या विद्यापीठाला ‘सर्वोत्कृष्ट विद्यापीठ’ म्हणून मानाचा सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार आणि शंभर कोटी रुपयांचा बक्षीस निधी प्राप्त झाला होता, ही बाब त्याच्या गुणवत्तेची साक्ष देते.
मात्र केंद्र सरकारकडून शेती व शेतकरी प्रश्नांकडे अपेक्षित तेवढे लक्ष दिले जात नसल्याचे वारंवार जाणवते; याची खंत व्यक्त करीत डॉक्टर अशोक ढगे यांनी सांगितले की त्याचा परिणाम कृषी विद्यापीठांच्या प्रगतीवर होत आहे. राष्ट्रीय स्तरावरील क्रमवारीचा विचार करता राहुरी विद्यापीठाला मिळणाऱ्या सुविधा, संशोधनासाठीचा निधी, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि आवश्यक त्या संख्येने शास्त्रज्ञ उपलब्ध करून देण्याबाबत अधिक ठोस भूमिका मांडली गेली असती, तर ती अधिक परिणामकारक ठरली असती.
या विद्यापीठाने जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, नामवंत प्राध्यापक तसेच प्रशासनात उत्कृष्ट कार्य करणारे कलेक्टर, कमिशनर, मंत्री व कॅबिनेट मंत्री घडवले आहेत. शेतकऱ्यांसाठी तृणधान्ये, कडधान्ये, भाजीपाला व फळपिकांच्या अनेक सुधारित जाती विकसित करून तंत्रज्ञानाच्या शिफारशी थेट शेतापर्यंत पोहोचवल्या आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरूपद पद्मश्री सन्मानित आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधन क्षेत्रातील मान्यवरांनी भूषविले असून सक्षम नेतृत्वामुळे कृषी संशोधनात भरीव आघाडी घेतली गेली आहे.
भारतीय पातळीवर नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) अंतर्गत सुमारे ६० हजार संस्था सहभागी होतात. अशा स्पर्धात्मक वातावरणात दर्जा टिकवण्यासाठी अत्याधुनिक सुविधा, सक्षम मनुष्यबळ व सातत्यपूर्ण आर्थिक पाठबळ अत्यावश्यक असते. तब्बल एका दशकानंतर डॉ. खर्चे यांच्या रूपाने सक्षम व दृष्टीकोन असलेले कुलगुरू लाभल्याने विद्यापीठाबाबत नव्या आशावादाची निर्मिती झाली आहे.
१९६६ मधील हरित क्रांती ही कृषी इतिहासातील मैलाचा दगड ठरली; त्यामागे कृषी शास्त्रज्ञांचे संशोधन, शेतकऱ्यांचे परिश्रम आणि त्या काळच्या राजकीय नेतृत्वाचे भक्कम आर्थिक व मानसिक पाठबळ हे घटक निर्णायक ठरले होते. आजही तसाच एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत ढगे यांनी व्यक्त केले
राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते राहुरी कृषी विद्यापीठाचे गुणगौरव करतात; मात्र आर्थिक सहकार्य, संशोधनासाठी निधीवाढ आणि शास्त्रज्ञांच्या गुणात्मक व संख्यात्मक वाढीसाठी अपेक्षित ती तत्परता दिसून येत नाही. सध्या सुमारे ५५ टक्क्यांहून अधिक संशोधन शास्त्रज्ञांच्या जागा रिक्त असल्याची वस्तुस्थिती चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर पक्षविरहित सर्व नेत्यांनी एकत्र येऊन संस्थेला राजकीय पाठबळ, आवश्यक निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी ठोस प्रयत्न करणे या गोष्टींकडे देखील डॉक्टर ढगे यांनी लक्ष वेधले

