“१०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी केल्यास जमिनीत पुरेसा ओलावा टिकतो. त्यामुळे पिकांना पाण्याचा ताण कमी बसतो,”
नेवासा : पारंपरिक पीक पद्धतीत बदल करताना आता शेतकऱ्यांनी हंगामापेक्षा हवामानाच्या बदलत्या स्वरूपानुसार पीक रचना आखण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी येथे केले.
प्रवरा संगम येथे शेतकरी मेळावा ते बोलत होते गेल्या काही वर्षांत जागतिक तापमानवाढ, पर्जन्यमानातील अनियमितता, आणि हवामानातील अस्थिरता यामुळे शेतीस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. “पूर्वी शेतकरी पारंपरिक हंगामाच्या आधारे पिकांची योजना करत होते. मात्र हवामानातील बदलांचा अभ्यास करता आता पीक नियोजन हवामानाशी सुसंगत असावे लागते,” असे डॉ. ढगे म्हणाले.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी समाधानकारक पावसाची शक्यता असून एल निनोचा प्रभाव कमी झाल्यामुळे पावसाळा वेळेत आणि भरपूर होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगामात पीक नियोजन योग्य रित्या केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते.
डॉ. ढगे यांनी सुचवले की, हलक्या व कोरडवाहू जमिनीत मुगासारख्या पीकांची निवड फायदेशीर ठरू शकते. “१०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी केल्यास जमिनीत पुरेसा ओलावा टिकतो. त्यामुळे पिकांना पाण्याचा ताण कमी बसतो,” असे ते म्हणाले.
पावसात खंड पडल्यास एक संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था असावी. यासोबतच, आठ किलो केओलीन १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास पिकांना ताण सहन होतो आणि उत्पादनात वाढ होते. ही फवारणी सर्व प्रकारच्या पिकांवर करता येते.
मध्यम प्रकारच्या जमिनीत तुरीचे, तर भारी काळ्या जमिनीत कपाशीचे पीक घ्यावे. या पिकांसाठी नवीन उच्च उत्पादकतेचे वाण बाजारात उपलब्ध असून त्याचा विचार करावा, असेही डॉ. ढगे यांनी सांगितले.
खत व्यवस्थापनात जैविक, सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर आवश्यक आहे. जमिनीतील जिवाणूंची संख्या कमी झाल्यामुळे योग्य जैविक खते वापरल्यास जमिनीची सुपीकता व खतांची कार्यक्षमता वाढते. ही खते अल्प दरात कृषी विज्ञान केंद्रांमध्ये उपलब्ध असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.