शेतकरी सावकारांचा जाच, वीज कोसळणे, वन्यप्राण्यांचे हल्ले अशा अस्मानी व सुलतानी संकटांना सामोरे जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रभावी आणि कठोर कायदेशीर संरक्षण देणारा स्वतंत्र कायदा अत्यावश्यक ….
नेवासा :
विदर्भातील एका शेतकऱ्याने सावकाराच्या अमानुष छळाला कंटाळून खाजगी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकण्याची वेळ येणे हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार असल्याची तीव्र टीका कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केली. या घटनेतून महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाची निष्क्रियता स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर येथील शेतकऱ्याने एक लाख रुपयांच्या कर्जापोटी तब्बल आठ लाख रुपये परत करूनही सावकारांचे समाधान झाले नाही. उलट त्याची सातत्याने आर्थिक लूट सुरूच राहिली. शेतकऱ्यांना संरक्षण देणे ही कृषी मूल्य आयोगाची प्राथमिक जबाबदारी असताना, कोणतेही ठोस कायदेशीर संरक्षण मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे.
या प्रकरणात तक्रार देऊनही पोलिसांनी दखल न घेणे गंभीर असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. ढगे यांनी केली.

