नेवासा
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या प्रभावी भाषणांतून प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडत शिवसैनिकांमध्ये स्वाभिमान जागवला आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. त्यांनी जात-पात व धर्मभेद न मानता राष्ट्रभक्तीचे विचार दिले. मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या बाळासाहेबांनी दिलेला हिंदुत्वाचा वैचारिक वारसा पुढे नेणे हीच त्यांना जन्मशताब्दीनिमित्त खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन तालुका अध्यक्ष नितीन जगताप यांनी केले.
नेवासा येथील नगर पंचायत चौकात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शहरप्रमुख नितीन जगताप, पोलीस निरीक्षक महेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, गोरख घुले व अंबादास लष्करे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना नितीन जगताप यांनी सांगितले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी शिवसैनिक घडले असून त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर त्यांच्या विचारांना अभिप्रेत असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कार्यक्रमास युवासेना शहरप्रमुख सागर शिंदे, रुपेश उपाध्ये, योगेश रासने, अक्षय दाणे, सतीश म्हस्के, माजी नगरसेवक संदीप बेहळे, रणजित सोनवणे, बिट्टू धनवटे, गणेश झगरे, शुभम पवार, गणेश व्यवहारे, दत्तात्रय औटी, कैलास इरले, शरद पंडुरे, श्रावण रेनिवाल, सुरेश धनवटे, आकाश एरंडे, संदीप शिंदे व शुभम धनवटे आदी उपस्थित होते.

