भेंडा येथे कथा व काव्य लेखन कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न…
नेवासा
आजच्या गतिमान जगात समाधान व आनंदी जीवनासाठी मराठी काव्यनिर्मिती ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. अशोकराव ढगे यांनी केले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडा येथे कथा व काव्य लेखन कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य शाखा नेवासा आणि जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत नवोदित कवी व लेखकांना मार्गदर्शनासह वैचारिक मंथनाची संधी मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. अशोकराव ढगे होते. प्रारंभी लोककवी दिगंबर गोंधळी यांनी संबळ वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करत वातावरण उत्साही केले. शाखाध्यक्ष डॉ. प्रा. किशोर धनवटे यांनी प्रस्ताविकात साहित्यातील शब्दांचे महत्त्व अधोरेखित करून उपस्थितांचे स्वागत केले.
प्रमुख उपस्थितीत शब्दगंध साहित्यिक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेंद्र उदागे, कॉम्रेड बाबा आरगडे, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, उपप्राचार्य डॉ. संभाजीराव काळे, विश्वस्त प्रा. डॉ. नारायणराव काळे, संस्थापक सचिव सुनील गोसावी, प्रा. दिगंबर सोनवणे, पांडुरंग रोडगे, ग्रामीण साहित्यिक भाऊसाहेब सावंत, कवी बाळासाहेब आरगडे, रामकृष्ण नवले तसेच प्रा. डॉ. अशोक कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य शिरीष लांडगे यांनी काव्यनिर्मितीचे मर्म नवोदित कवींना उलगडून सांगितले. कार्यशाळेचा मुख्य उद्देश नवोदित कवी व लेखकांना सखोल विचार करण्यास प्रवृत्त करणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तर.भाऊसाहेब सावंत यांनी कथा निर्मिती संदर्भात सविस्तर विवेचन केले,
अध्यक्षीय भाषणात डॉ. अशोकराव ढगे यांनी पुढे सांगितले की मराठी कथा व कवितेत समाजाचे प्रतिबिंब आढळते. आपण जे पाहतो आणि अनुभवतो त्याचे शब्दांकन म्हणजेच ज्वलंत व जिवंत साहित्य होय, असे त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केले. साहित्याची भाषा ज्वालाग्रही आणि मर्मग्राही शब्दांत व्यक्त होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेत २३ नवोदित कवींनी आपल्या कविता सादर केल्या. जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका मोहिनी साठे आणि प्राध्यापिका पोकळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अशोक कानडे यांनी केले.

