नागरिकांचा संताप -हंडा-दंडुका मोर्चाची घोषणा, अधिकाऱ्यांवर काळी शाई टाकण्याचा इशारा….
:
नेवासा : शहर व उपनगरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा अत्यंत अनियमित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. आठ ते दहा दिवसांनीच पाणी येत असल्याचा आरोप करत ॲड. संजय सुखदान यांनी नेवासा नगरपंचायत प्रशासनाला आक्रमक इशारा दिला आहे. पाणीपुरवठा तात्काळ नियमित न झाल्यास नगरपंचायत कार्यालयावर हंडा-दंडुका मोर्चा काढून अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर काळी शाई टाकण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही नगरपंचायत प्रशासन पाणीपुरवठा नियमित करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन गरजांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, मोर्चाची तारीख आधी जाहीर केल्यास अधिकारी अनुपस्थित राहण्याची शक्यता असल्याने निवेदन दिल्यापासून पुढील आठ दिवसांच्या कालावधीत मुख्याधिकारी कार्यालयात उपस्थित असतील त्या दिवशी अचानकपणे मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मोर्चादरम्यान अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर काळी शाई टाकून निषेध नोंदविण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. पाणीपुरवठा नियमित करण्यात आल्याचे लेखी आश्वासन तात्काळ देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, तहसीलदार, नेवासा पोलीस निरीक्षक तसेच प्रेस क्लब नेवासा यांना देण्यात आल्या आहेत.
चौकट : गुढीपाडवा गीत रमजान रामनवमी काळात
नेवासा शहरात आठ-दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आता नागरिक आक्रमक आंदोलनाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

