नगरपंचायतचे कर वेळेवर भरण्यासाठी समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन होणार
नेवासा(प्रतिनिधी)नगरपंचायतची थकीत पाणीपट्टी घरपट्टी करावरील शास्ती शासनाच्या अभय योजने अंतर्गत शंभर टक्के रद्द करण्यात यावी अशी मागणी समर्पण फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील यांनी नेवासा नगरपंचायतद्वारा अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की नगरपंचायत नेवासा अंतर्गत कर वसुली विभागाने शास्ती लागु करताना कोणत्याही पद्धतीची पुर्व सुचना दिलेली नव्हती. परस्पर शास्ती लागु केल्याने एक प्रकारे नेवासकर नागरिकांमध्ये तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी अन्याय केल्याची भावना दृढ झाली आहे. याबाबत आम्ही वारंवार वरिष्ठांकडे तक्रार करून शास्ती रद्द करण्याबाबत पाठपुरावा केलेला आहेच.
संदर्भात उल्लेख केलेल्या शासन निर्णयानुसार अभय योजनेअंतर्गत शास्ती रद्द करण्याबाबत नगर विकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. या शासन निर्णयाचा आधार घेऊन आम्ही आपणास विनंती करतो की यापुर्वीची नगरपंचायतने लागू केलेली नागरिकांवरील सर्व शास्ती शंभर टक्के अभय योजनेअंतर्गत माफ करावी अशी मागणी केली आहे.
नगरपंचायतचे कर वेळेवर भरण्यासाठी समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करण्यात येईल अशी ग्वाही निवेदनात देण्यात आली असून आमच्या मागणीचा गंभीरता पूर्वक विचार करुन तातडीने शास्ती शासनाच्या अभय योजनेच्या अंतर्गत शंभर टक्के माफ होण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे