रू901/- च्या कापूस बियाण्याचे पाकीट तब्बल रु. 1400/- ला विकल्याची तक्रार
नेवासे
चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगाम लवकर सुरू झालाय खरीप हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांकडून कापूस बियाण्यांची मागणी वाढली असताना, काही व्यापारी शासननिर्धारित दरापेक्षा जादा दराने बियाणे विकून शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
पाचेगाव येथील त्रिमुर्ती ॲग्रो सर्व्हिसेस या कृषि केंद्राने शासनाने निश्चित केलेल्या दर रु. 901/- च्या कापूस बियाण्याचे पाकीट तब्बल रु. 1400/- ला विकल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करत नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
या कारवाईसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे व कृषि विकास अधिकारी सुधीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे, तालुका कृषि अधिकारी धनंजय हिरवे, पंचायत समितीचे कृषि अधिकारी प्रताप कोपनर आणि मोहीम अधिकारी अमृत गांगर्डे यांनी संयुक्त तपासणी केली. त्यांनी ग्राहक (शेतकरी) यांचेकडून माहिती मिळवून, ऑनलाईन पेमेंट व बिलाद्वारे पुरावा तयार केला. एका शेतकऱ्याने रु. 1400/- ला बियाणे खरेदी करून बिल मात्र रु. 901/- चे घेतल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय 6 पाकिटांचे बिल रु. 5406/- दाखवून प्रत्यक्षात रु. 6300/- घेतल्याचा प्रकारही समोर आला.
तपासणीत बियाण्याच्या साठ्याची माहिती, दरफलक, स्त्रोत परवाना इ. बाबतीत गंभीर त्रुटी आढळल्या. यानुसार, भारतीय न्यायसंहिता मधील कलम 318(4), बियाणे नियंत्रण आदेश 1983 मधील खंड 3, 8, 18, आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कलम 3(1), 3(2)(C), 3(2)(D), 3(2)(E), 7(i)(a)(ii) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट–
विक्रेते शेतकऱ्यांना वेठीस धरत असून, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल तसेच जादा दर, बोगस अथवा निकृष्ट निविष्ठांची विक्री दिसल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ कृषि विभागाशी संपर्क साधावा.— जिल्हा कृषि अधिकारी सुधाकर बोराळे व कृषि विकास अधिकारी सुधीर शिंदे