नवीन व बंद झालेली रेशन कार्डे गृहीत धरून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लाभार्थी धान्यापासून वंचित
नेवासा (प्रतिनिधी) –
नेवासा तालुक्यातील अनेक रेशनधारक कुटुंबांना स्वस्त धान्य मिळत नसल्याने तालुक्यासाठी २० हजार इष्टांक वाढवावेत, अशी मागणी नेवासा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरदराव आरगडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात आरगडे यांनी म्हटले आहे की, मागील चार-पाच वर्षांपासून अनेक ग्रामपंचायतींनी गरजू लाभार्थ्यांसाठी ठराव तहसील कार्यालयाकडे पाठवले असूनही अनेकांना आजही रेशन मिळत नाही. तहसील कार्यालयात इष्टांक शिल्लक नसल्याचे सांगितले जाते.
ग्रामपंचायतींनी मयत व्यक्ती व लग्न झालेल्या महिलांच्या नावावरील रेशन रद्द करून गरजूंना ते वाटप व्हावे यासाठी ठराव दिले आहेत. मात्र, त्यांच्या गावे वगळून इष्टांक इतर गावांना दिले जात असल्याचे निदर्शनास आल्याचेही आरगडे यांनी सांगितले.
नवीन व बंद झालेली रेशन कार्डे गृहीत धरून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत. त्यामुळे तातडीने किमान २० हजार इष्टांक नेवासा तालुक्यास मंजूर करावेत, अन्यथा सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत.