नेवासे (प्रतिनिधी): अवघ्या एका तासाच्या जोरदार पावसाने नेवासा शहरातील बाजारपेठ जलमय झाली. ड्रेनेज होल बंद, गटारी तुंबलेली आणि निचऱ्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे बाजारपेठ व परिसरात पाणीच पाणी साचले. नागरिक आणि व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल झाले असून, नगरपंचायतीच्या ढिसाळ नियोजनावर सवाल उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, मागील वर्षीच नगरपंचायतीला मानसूनपूर्व कामांसंदर्भात पत्र देण्यात आले होते, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर आले, मॅनहोल बंद असल्यामुळे निचरा होऊ शकला नाही आणि परिसरात दुर्गंधीचा त्रास निर्माण झाला. बाजारपेठ व नगरपंचायत कार्यालय परिसरात मॅनहोल उघडा ठेवला की प्रचंड दुर्गंधी निर्माण होते, त्यामुळे तो कायम बंद ठेवण्यात येतो यामुळे पाणी रस्त्यावरच साचून राहते. नेवासा शहरात तयार केलेले बंद गटारी या तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या आणि ठेकेदारांच्या भ्रष्टाचारा मुळे निकृष्ट आणि पाण्याचा उतार न पाहता केलेल्या आहेत
या परिस्थितीचे मुळ कारण म्हणजे नेवासा नगरपंचायतीतील प्रशासकीय अस्थिरता. मागील एक वर्षात सहा प्रभारी अधिकारी बदलले गेले असून, यामुळे नगरपंचायतीचे कामकाज पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
अंबादास गुरसळ साहेब गेल्यानंतर काही काळ सोनाली म्हात्रे या प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी सुमारे तीन-चार महिने जबाबदारी सांभाळली. त्यानंतर प्रभारी अधिकाऱ्यांची मालिकाच सुरू झाली. राहुरीचे ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी एक महिना काम पाहिले, त्यानंतर श्रीरामपूरचे सोमनाथ जाधव यांनीही एक महिनाच जबाबदारी सांभाळली. शेवगावच्या विजया घाडगे यांनी केवळ पंधरा दिवस काम पाहिले, तर देवळालीचे विकास नवाळे हे फक्त आठवडाभरच राहिले. सध्या पाथर्डीचे संतोष लांडगे कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त आहेत,
चौकट -पूर्णवेळ अधिकारी देता येत नसेल तर शासनाने नगरपंचायत का केली हा प्रश्न आहे नगरपंचायतीच्या कोणत्याही सुविधा नेवासकरांनाआतापर्यंत दिसलेल्या नाहीत त्यामुळे आपली ग्रामपंचायतच बरी होती – डॉक्टर करणसिह घुले समर्पण फाउंडेशन
या अधिकाऱ्यांपैकी बहुतेकांनी केवळ एक-दोन दिवस उपस्थिती लावून परत जाणे पसंत केले, त्यामुळे नागरी कामांपासून ते कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यापर्यंत सर्वच प्रक्रिया ठप्प झाल्या आहेत.
नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या सर्व गोंधळाचा तीव्र निषेध करत, नेवासा नगरपंचायतीसाठी स्थायिक व पूर्णवेळ कार्यकारी अधिकाऱ्याची तातडीने नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा शहरातील प्रशासन कोलमडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.