केवळ मारहाणच नाही, तर दोघींना जिवे ठार मारण्याच्या धमक्याही
गणेशवाडी – गणेश राव बेल्हेकर याच कडून
– नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे शेतीच्या वादातून थरारक प्रकार घडला. भरदुपारी शेतात मशागत करत असलेल्या महिलेला कोयत्याने बेदम मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना दि. ८ जून रोजी घडली असून परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
सुनीता अनिल काकडे (वय ४९, रा. गोपाळ वस्ती, वंजारवाडी) या त्यांच्या शेतात काम करत असताना अचानक प्रकाश शामराव काकडे, दिपाली प्रकाश काकडे, निखिल प्रकाश काकडे (सर्व रा. वंजारवाडी) व राजकौर पटारे (रा. तरवडी) हे कोयता घेऊन त्यांच्या शेतात शिरले. “येथे मशागत करू नका” असा दम भरत त्यांनी सुनीता काकडे यांच्यावर थेट कोयत्याने हल्ला चढवला.
या थरार पाहून राणी खंडागळे वाद मिटवण्यासाठी धावल्या असता, त्यांनाही शिवीगाळ करत हाताचा प्रसाद दिला गेला. केवळ मारहाणच नाही, तर दोघींना जिवे ठार मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या.
या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, सुनीता काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २२३/२०२५ नोंदवण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय नवीन दंड संहिता (BNS) अंतर्गत कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५१(२)(३), ३५२, ३(५) प्रमाणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल बडे करत आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.