
नेवासा(प्रतिनिधी):– शिवरायांनी हवामानाचा लहरीपणा लक्षात घेऊन जलव्यवस्थापन करण्यावर भर दिला. झाडांची कत्तल म्हणजे प्रजेला पीडा देणे होय, असे छत्रपती शिवाजीराजांचे मत होते. आपल्या लेकरा प्रमाणे झाडांना सांभाळा, त्यांना पीडा देऊ नका, त्यांची लागवड करा, असे विचार शिवाजीराजांनी दिले.
पर्यावरणाचे रक्षण करणे, हे आपले कर्तव्य आहे ही त्यांची भूमिका होती. आजच्या काळात शिवकालीन पर्यावरण नीतीचे अनुकरण करण्याची गरज आहे असे प्रतिपादन जलमित्र सुखदेव फुलारी
यांनी केले.
नेवसा तालुक्यातील भेंडा येथील श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संस्थेचे विश्वस्त माजी आ.पांडुरंग अभंग यांचे प्रमुख उपस्थितीत व विश्वस्त काशिनाथ नवले पाटील यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमात “पर्यावरण संरक्षण” याविषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून श्री.फुलारी बोलत होते.
जलमित्र श्री.फुलारी पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी मृदा संधारण,जल व्यवस्थापन, वृक्ष संवर्धन यावर मोठे काम केले. सोन्याचा नांगर हाकून नापीक जमीन उपजाऊ केली. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी, बियाणे, औजारे देऊन शेती उत्पन्न वाढीस मदत केली. गडावरील शिबंदीला वर्षभर पाणी कसे पुरेल याचे नियोजन चोख
करून किल्ले बांधले. गडावर डोंगराच्या पोटात खोदलेली टाकी, तळी पाहिली की लक्षात येते महारांजाचे जलव्यवस्थापन आणि दूरदृष्टीकोन किती प्रचंड होता.
महाराजांच्या राज्यभिषेकाला रायगडावर एक लाखाहून अधिक पाहूणे आले होते. या महान समारंभातील सर्व लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या गडावरील पाणवठ्यावर केली होती. तरीसुध्दा पाण्याचा मुबलक साठा शिल्लक होता.शिवकाळातही दुष्काळी परिस्थिती होती. शिवरायांनी हवामानाचा लहरीपणा लक्षात घेऊन जलव्यवस्थापन करण्यावर भर दिला.
गडावर आधी पाणी पाहून किल्ला बांधावा, पाणी नाही आणि परंतु तेथे किल्ला बांधणे आवश्यक तेथे आधी खडक फोडून तळी-टाकी बांधून संपूर्ण गडाला पाणी पुरेल अशी मजबूत व्यवस्था करावी, गडाचे पाणी जतन करावे.’ पाणी बचतीचाही संदेश शिवरायांनी दिला.
महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात वृक्षतोड थांबविण्याचा संदेश दिलेला आहे. त्यामुळेच आजच्या काळात ही शिवकालीन पर्यावरण नीतीचे अनुकरण करणे गरजेचे आहे.
महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात वृक्षतोड थांबविण्याचा संदेश दिलेला आहे. त्यामुळेच आजच्या काळात ही शिवकालीन पर्यावरण नीतीचे अनुकरण करणे गरजेचे आहे.
झाड सावली,फळ,लाकूड,ऑक्सिजन, पक्षांना निवारा देते त्याच बरोबर जमिनीची धूप थांबवते,जल पुनर्भरण करते,त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या निमिताने प्रत्येकाने एक तरी झाड लावण्याचा संकल्प करावा असे आवाहन श्री.फुलारी यांनी केले.
माजी आ.पांडुरंग अभंग म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची संकल्पना मांडली आणि ती साकार केली. स्त्रीया आणि समाजावर होणारे अन्याय-अत्याचार सहन न झाल्याचे त्यांनी आठरापगड जातींतील मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. आजच्या तरुण पिढीने शिवरायांची शिकवण व विचार घेऊन वाटचाल केली पाहिजे. सज्जनांची-संतांची संगत करा,प्रगती पथावर आहे त्याची संगत करा आणि झेप घ्या,तुमची वृद्धी झाल्या शिवाय राहणार नाही. इतिहास चाळला तर ज्यांना परिस्थितीचे चटके बसलेत तीच माणस घडली. आपण आपल्या ज्ञानाची उंची वाढवली तर आकाश ही ठेंगणे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. काशिनाथ नवले पाटील म्हणाले,राज्य आपले,जनता आपली,जमीन आपली आणि बांधिलकी मोगलांशी,हे योग्य नाही.आपण मोगलांशी लढू शकतो आणि स्वराज्य निर्माण करू शकतो हा विचार राजांनी मांडला.
निदेशक आप्पासाहेब गादे,संजय उगले,अर्जुन आव्हाड,सुनिल निंबाळकर,शंकर म्हस्के,दिलीप गुजर, अजिनाथ माळी,सचिन भोसले,जालिंदर जाधव, देविदास देवढे,प्रविण मिसाळ,योगेश गायकवाड यांचे सहवीद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
आयटीआयचे गट निदेशक कोंडीराम मडके यांनी प्रास्ताविक केले.
चांगदेव लोढे यांनी सूत्रसंचालन केले.
संजय वाबळे यांनी आभार मानले.