सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळयास धर्मध्वजारोहनाने प्रारंभ
नेवासे
सदगुरू श्री नारायणगिरी महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ नेवासा बुद्रुक शिवारातील सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमामध्ये महंत गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि.२ मे पासून अखंड हरिनाम सप्ताह सोहळयास संत महंतांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाने भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला.समाजाचा समतोल राखण्यासाठी संत विचारांची आज गरज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या धर्मध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज,महंत श्री उद्धवजी महाराज, श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरीजी महाराज, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरी महाराज, मध्यमेश्वर देवस्थानचे महंत ऋषिनाथजी महाराज यांच्या हस्ते सदगुरू नारायणगिरी महाराज यांच्या मंदिरातील मूर्तीचे वेदमंत्राच्या जयघोषात पूजन करण्यात आले त्यानंतर बाहेरील प्रांगणात श्रीफळ वाढवून धर्मध्वजपूजन करण्यात आले.भेंडा येथील वेदशास्त्रसंपन्न आचार्य हेमंतगुरू कुलकर्णी यांनी झालेल्या धार्मिक कार्याचे पौरोहित्य केले.
यावेळी बोलतांना स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज म्हणाले की सुंदर वक्तृत्व,गोड वाणी,सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कार्यपद्धती व सदगुरुंविषयी असलेली निष्ठा जोपासणारे महंत उद्धवजी महाराज हे अवलिया असून आपल्या धर्म कार्याच्या माध्यमातून वारकरी संप्रदायामध्ये आगळा वेगळा ठसा उमटवणारे थोर असे व्यक्तिमत्त्व असल्याचे गौरवोदगार त्यांनी यावेळी बोलतांना काढले
.अध्यात्म व संत विचारात मोठी ताकद असून अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून ती आपल्याला प्राप्त होते त्यामुळे अखंड हरिनाम सप्ताहाचीव भक्ती उत्सवाची आज खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महंत श्री सुनीलगिरी महाराज म्हणाले की मंगलता,दिव्यता व रमणीयता याचा त्रिवेणीसंगम सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमामध्ये पहावयास मिळते. आपल्या धर्मात भगवा हे त्यागाच प्रतीक मानले गेले आहे,
यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब झिने सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सोहळा संयोजक उद्धवजी महाराज मंडलिक यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले.

चौकट:- सदगुरू नारायणगिरी महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे ४ ते ६ काकडा भजन,सकाळी ७ वा.स्तोत्रपठण व श्रींची आरती, सकाळी ८ ते १२ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी १२ ते २ भोजनप्रसाद, दुपारी ४ ते ५ प्रवचन,सायं.५ ते ६ हरिपाठ, सायं. ७ ते ९ श्रीहरिकीर्तन व तदनंतर महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.अखंड हरिनाम सप्ताहामध्ये होणाऱ्या प्रवचन व किर्तनांचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांनी केले आहे.