

नेवासा (अहिल्यानगर) – जळके खुर्द गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ₹2.84 लाख खर्चून उभारलेलं सार्वजनिक शौचालय आज पूर्णपणे बेकार अवस्थेत आहे. दरवाजे बंद, पाण्याचा ठसा नाही, स्वच्छतेचा अभाव आणि कोणताही वापर नाही.
शौचालयाच्या दोन्ही विभागांपैकी महिलांसाठीचा विभाग कायम बंद ठेवलेला आहे. पुरुष विभागात अस्वच्छता इतकी की तिथे प्रवेश करणं कठीण झालं आहे. संपूर्ण संकुलात कपडे, बॅगा, अन्य सामान ठेवल्याचं दिसतं. शौचालयाचा वापर स्वच्छतागृह म्हणून नव्हे तर गोदाम म्हणून होत असल्याचं चित्र स्पष्ट आहे.

या शौचालयात एक शौचालय, एक बाथरूम, दोन मुताऱ्या, एक हात धुण्याचं बेसिन अशी सुविधा कागदावर दाखवली गेली आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतीही सुविधा कार्यरत नाही. पाण्याचा पुरवठा नाही, स्वच्छतेची जबाबदारी नाही आणि देखभालीचा पत्ता नाही.
गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक पैशातून उभारलेलं शौचालय आज कोणीही वापरत नाही, उलट गावकरी आजही उघड्यावर शौचास जाण्यास मजबूर आहेत. स्त्रियांसाठी उभारलेला विभाग लॉक ठेवलेला असल्याने महिलांची विशेष अडचण होते.
लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत आणि प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याची भावना ग्रामस्थांत आहे. कामाचे आदेश, खर्चाचा हिशोब आणि देखभाल याची कोणतीही माहिती ग्रामस्थांना दिली गेली नाही.
₹2.84 लाख खर्चूनही जेव्हा शौचालय गावकऱ्यांच्या उपयोगात येत नाही, तेव्हा ‘स्वच्छ भारत’चा अर्थ केवळ कागदावरच उरल्याचं या घटनेतून दिसून येतं.
या शौचालयावर कोणताही माहितीफलक लावलेला नाही. ठेकेदाराचं नाव, खर्चाची माहिती, कामाचे तपशील कुठेही उपलब्ध नाहीत. पारदर्शकतेचा अभाव आणि जबाबदारीचं स्पष्ट चित्र दिसतं.